Tuesday, December 18, 2012

मर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते



बन बांबूचे पिवळ्या गाते
  आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
  जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
  जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
  नवी पाउले, पण मेलेली
शतशतकांच्या पायलन्स वरती
  किती कावळे टिंबे देती
उभा जागृती क्रियापदांचा
 खडा पहारा, पण रोबोंचा
अढळ धृवाचा ढळला तारा
 सप्तर्षींचा चुकला प्रश्न
गारठल्यावीण गळती गारा
 अन् रेडिओवर राधेकृष्ण
 
               बा.सी. मर्ढेकर

मर्ढेकरांची ह्या कवितेला  दुसऱ्या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट,  सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ? ते कोठे आहे? ते  का गात आहे? आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे ?  कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसऱ्या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे. मर्ढेकरानीच असे म्हणले आहे की
शब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण भूमिकेचा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही. 
 ह्या कवितेत शब्दापलीकडले बरेच काही आहे. किंबहुना सर्वच काही शब्दा पलीकडले आहे. कारण केवळ कवितेतील शब्दांचा अर्थ पाहीला तर फारसा अर्थबोध होत नाही. त्यात मर्ढेकरांनी अशा काही प्रतिमा वापरलेल्या आहेत की संदर्भ माहीत असल्याशीवाय त्यांचे आकलन होणेच शक्य नाही. ही कविता समजण्याकरीता दुसऱे महायुध्द समाप्तीचा काळ, त्या काळातील घटना, आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरेची माहीती पाहीजे.
हया घटना १९४३ ते १९४५ सालातल्या आहेत. दुसऱया महायुध्दात दोस्त राष्ट्रांची निर्णायक विजयाक़डे वाटचाल चालू होती. जर्मनीचा संपूर्ण पाडाव दृष्टीपथात आला होता. जर्मन सैन्याचा रशिया व आफ्रीकेत मोठी पिछेहाट होत होती. दोन्ही आघाड्यांवरील सेनापतींच्या लक्ष्यात आले होते की पराभव अटळ आहे. त्यांनी सैन्य वाचविण्याकरीता माघार घेण्याची परवानगी मागीतली होती. परंतु हिटलरने ती दिली नाही. उलट त्याने सेनापतींना अशी आज्ञा दिली की लढता लढता मरण पत्करा पण माघार घेउ नका. रशियातील हिवाळ्यातील  हाडे फोडणारी थंडी, अन्न व ईतर रसदीची टंचाई ,रशियन सैन्याचे वारंवार होणारे हल्ले अशा परीस्थितीमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. रशियन सेनांनीनी जर्मन सैन्यास रशियनांसमोर शरणागती पत्करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्याची शिफारस जर्मन सेनांनीनी हिटलरकडे केली होती. परंतु   केवळ हिटलरच्या युध्द चालू ठेवण्याच्या हट्टापायी लाखो सैनिकांना मरण पत्करावे लागले. जे वाचले ते रशियाचे युध्दकैदी झाले. त्यांना सैबेरीयात पाठविण्यात आले. जर्मन जनतेत व सेनाधिकाऱ्यांमध्ये हिटलरबध्दल असंतोष पसरला. त्याची परीणीती हिटलरला मारण्याच्या कटात झाली. परंतु तो कट फसला.  त्यानंतर काही महीन्यातच दोस्त राष्ट्रांच्या सेना बर्लिनच्या सीमेपर्यंत येउन ठेपल्यानंतर हिटलरने आत्महत्या केली व  जर्मनीने शरणागती पत्करली. परंतु जपानने युध्द चालूच ठेवले होते. जपानने शरणागती पत्करावी असा प्रस्ताव दोस्त राष्ट्रांनी जपानसमोर ठेवला होता. परंतु जपानने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरीकेने जपानमधील हिरोशिमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली.  ह्या कवितेतील पिवळ्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानशी आहे. आता प्रत्यक्ष कवितेकडे वळुया.

       बन बांबूचे पिवळ्या गाते
          आकाशातील अघोरेखिते
 
 
जपानच्या लोकजीवनात बांबूला असाधारण महत्व आहे. घरबांधणीपासून ते अनेक नित्योपयोगी वस्तु बनवण्याकरीता बांबूचा उपयोग केला जातो. दहाव्या शतकात लिहीलेली पहिली ज्ञात जपानी लोककथा बांबू तोडणाऱ्या माणसावर आहे. बांबूला जपानमध्ये दैवी महत्व आहे. तेथील प्राचीन  शिंटो धर्माच्या अनेक देवळांभोवती बांबूची बने आहेत. ही बने देवळांना दृष्ट शक्तीपासून दूर ठेवतात असा समज आहे. तसेच बुध्द मंदिरांच्या भोवती ही बांबूची बने आहेत. जपान मधील क्योटो ह्या शहराच्या परीसरात सुमारे २००० प्राचीन शिंटो व बुध्द मंदिरे आहेत. तसेच जपानच्या सम्राटाचे राजवाडे आहेत. पू्र्वी क्योटो ही जपानची राजधानी होती व जपानच्या सम्राटाचे अनेक शतकांचे निवासस्थान होते. अजूनही हे शहर जपानची सांस्कृतीक राजधानी समजले जाते. दुसऱ्या महायुध्दात सुध्दा ह्या शहराचे धार्मिक व सांस्कृतीक महत्व लक्षात घेउन अमेरीकन विमानांनी कधीही बाँबफेक केली नाही. ह्या शहराच्या जवळ सॅगॅनो या नावाचे बांबूचे बन आहे.(SAGANO BAMBOO FOREST)  ह्या बनातून येणाऱ्या वाऱ्याचा आवाजाची गणना जपानमधील सर्वोत्कृष्ट आवाजात होते. १८७० मध्ये वि़जेचा बल्ब मधील तंतूकरीता याच बनातील बांबूपासून बनविलेला तंतूचा वापर केला होता. हे सर्व लक्ष्यात घेता मर्ढेकरांनी जपानकरीता बांबूच्या बनाची प्रतिमा वापरली असावी. ह्या बनाच्या पिवळेपणाचा संबंध जपानी लोकांच्या पीतवर्णाशी असावा. तसेच ह्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानच्या सम्राटाशी पण आहे. हे समजण्याकरीता  कवितेतील पुढील ओळीतील अवकाशातील अधोरेखीते चा अर्थ काय  आहे, हे पाहिले पाहिजे.
दुसऱ्या महायुध्दात जपानवर  अमेरीकेने  टाकलेल्या अणुबाँबने केलेल्या भीषण मनुष्य संहाराचा परीणाम होउन, आणखी हानी टाळण्या साठी जपान शरण येण्यास तयार झाला. तेव्हा जपानचे सम्राट हीरोहीटो ह्यांचे  जपानी जनतेला उद्देशून भाषण , १५ ऑगस्ट, १९४५ ला  रेडीओ जपानने प्रसारीत केले. हे  भाषण इंपेरीयल रीस्क्रीप्ट ऑन सरेंडर अशा नावाने प्रसिध्द आहे. अवकाशातील अधोरेखीत म्हणजे हे भाषण असावे. अधोरेखीत हा शब्द रीस्क्रीप्ट या इंग्रजी शब्दाच्या अनुषंगाने वापरला असावा.  रीस्क्रीप्ट ह्या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ राजाने (रोमन सम्राटाने) किंवा पोपने एखादा प्रश्न औपचारीकरीत्या त्याच्याक़डे गेला असता, त्याने दिलेले उत्तर असा होतो. तर दुसरा अर्थ पुनर्लिखीत (Rewritten) असा होतो.   हे अधोरेखीत आकाशातील का आहे कारण ते जपानी रेडीओवरून म्हणजेच आकाशवाणीवरून प्रसारीत झाले होते. Gyokuon-hōsō, lit. "Jewel Voice Broadcast", was the radio broadcast in which Japanese emperor Hirohito read out the Imperial Rescript on the Termination of the War. ह्याला जपानी भाषेत ग्योकौन होसो असा शब्द आहे, त्याचा अर्थ अलंकारीक आवाजातील रेडीओ प्रसारण   असा होतो. कवितेतील गाते हया शब्दाचा संदर्भ ज्वेल व्हॉईस अथवा  अलंकारीक आवाज ह्या कल्पनेशी आहे. ह्या रेडीओ प्रसारणात जपानच्या सम्राटाने  युध्द संपले असे जाहीर केले. जपानच्या सम्राटाचा आवाज जपानी जनतेने प्रथमच ऐकला. कारण जपानच्या सम्राटाने थेट लोकांशी बोलण्याची पध्दत तेथे नाही. हे भाषण सुध्दा थेट भाषण नव्हते. जपान रेडीओच्या अघिकाऱ्यांनी सम्राटाच्या टोकिओतील राजप्रासादात जाऊन , ते भाषण दोन दिवस आधीच ध्वनीमुद्रीत केले होते.  ह्या भाषणाची ध्वनीमुद्रीका ( डीस्क) मोठया शिताफीने कपडयात लपवून राजप्रसादाच्या बाहेर काढण्यात आली. कारण राजप्रासाद जपानी बंडखोर सैनिकांच्या ताब्यात होता. जपानी सेनांनीना जपानने शरणागती पत्करावी हे  मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने शरणागती हा जपानच्या राष्ट्राभिमानाचा अवमान होता. त्या सर्वांची लढता लढता मरण पत्करण्याची तयारी होती. ह्या भूमिकेतून त्यांनी सम्राटाच्या विरोधात बंड करून त्याला ताब्यात घेतले होते व त्याला शरणागतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालला होता. पण तो यशस्वी होउ शकला नाही. युध्द संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायालयात अनेक जपानी सेनांनीना युध्द गुन्हेगार ठरवून फासावर लटकवण्यात आले. अनेकांनी शत्रुच्या हातात सापडण्याआधीच हाराकीरी केली.  परंतु जपानच्या सम्राटावर खटला भरण्याचे हेतूपुरस्पर टाळण्यात आले. कारण जपानी जनतेत सम्राटाविषयी असलेला आदर.

             चराचरातील दळते संज्ञा
          जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
जपानी रे़डीओवरचे सम्राटाचे हे भाषण जुनाट राजदरबारी जपानी भाषेत होते. त्यात प्रत्यक्ष शरणागती स्वीकारल्याचा उल्लेख नव्हता. त्याने जपान सरकारला दोस्त राष्ट्रांच्या अटी स्वीकारण्याची आज्ञा केल्याचे सांगितले.. ह्या भाषणाची भाषा औपचारीक व संदीग्ध  होती. त्यामुळे ऐकणारांच्या मनात जपानने खरोखर शरणागती पत्करली की नाही ह्याबध्दल संदेह निर्माण झाला.    युध्दाबध्दलचा उल्लेख, युध्द परीस्थितीने जपानला फायदेशीर असे वळण घेतले नाही, असा करण्यात आला.  तसेच हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता .त्यात असे म्हणले होते की शत्रुने नवीन विध्वंसक बाँबचा वापर चालू केला आहे. ह्या बाँबची हानी करण्याची क्षमता अपरीमित आहे व त्यामुळे लाखो निरपराध माणसांचा बळी जाण्याची शक्यता आहे. भाषणातील ह्या शब्दांचा संदर्भ हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबच्या घटनेशी लावण्यात येतो. ह्या भाषणाच्या समारोपाच्या वाक्यात असे म्हटले आहे की   कालाच्या आणी नियतीच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरीता सर्वंकश शांतीच्या मार्गाचा पाया रचण्याचा निर्धार केला आहे . आम्ही ह्याकरीता जी हानी व जे कष्ट सहन केले आहेत, ते कोणाच्याही सहनशीलतेच्या पलीकडचे आहेत 
कवितेतील चराचरातील दळते संज्ञा ही ओळ ह्या भाषणातील वापर केलेल्या भाषेला उद्देशून आहे. संज्ञा म्हणजे शब्द. चराचरातील म्हणते अखिल विश्वातील. ह्या भाषणाचे दळण दळण्यासाठी अख्ख्या दुनियेतून शब्द गोळा केले आहेत तरी सुध्दा भाषणाचा अर्थ संदीग्धच आहे. ह्या भाषणात असेही म्हटले होते की जर युघ्द चालू ठेवले तर केवळ जपानच्या नाशाबरोबरच संपूर्ण मानव जातीचा नाश होइल. म्हणून जपानच्या कोट्यावधी प्रजाजनांचे प्राण वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कवितेतील जगण्याची प्रतिज्ञा ह्या शब्दांचा अर्थ असा असावा. पण (उद्या ) हे शब्द सूचक आहेत. उद्या हा शब्द कंसात सहेतुक टाकला आहे.   ह्या शब्दांनी या ओळीचा अर्थ  वेगळाच होतो. जगायची तर प्रतिज्ञा केली आहे पण आज नाही. आज न जगता उद्या कसे जगता येईल ?  ह्याचे उत्तर ,अनेक जपानी सैनिक, सेनाधिकारी, व नागरीकांनी शरणागती पत्करण्यापेक्षा हाराकीरीच्या मार्गाने सन्मानाने मरणाला जवळ केले, ह्या घटनेत आहे. हाराकीरी ह्या जपानमधील आत्महत्त्येच्या प्रकाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. जपानमधील सामुराई योध्दे पुरातन कालापासून  आत्मसन्मान राखण्या करीता ह्या प्रकारानी विधीवत आत्महत्त्या करत. ह्या प्रकाराला जपानी भाषेत सेप्पुकू असेही नाव आहे. अशा  आत्महत्त्येपूर्वी ती करणाऱ्या माणसाने कविता लिहून ठेवण्याची पध्दत आहे. ह्या कवितेला मरणपूर्व कविता (isei no ku) म्हणतात. ह्या कवितेत मरणाचा थेट उल्लेख न करता प्रतीकरूपी उल्लेख करण्याची पध्दत आहे. अशा अनेक कविता हाराकीरी करण्याऱ्या सैनिकांच्या खिशात सापडल्या होत्या. जपानचा जनरल टो़जो हा जपानने अमेरीकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक केलेल्या  हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार होता. ह्या जनरल टोजोचा हाराकीरी करण्याचा प्रयत्न फसला. त्याला  न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमेरीकन सेनाधिकाऱ्यांना उद्देशून त्याने काढलेले  उदगार  असे आहेत.  तुम्ही आज जिंकला आहात आणि म्हणून युध्दाला जबाबदार कोण हे ठरवणे तुमच्या हातात आहे  परंतु चारपाचशे वर्षांनी इतिहासकारांचा निर्णय कदाचित वेगळा असेल . फाशी जाण्यापूर्वी त्याने खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिहून ठेवल्या आहेत.

        “ It is goodbye
Over the mountains I go today
   To the bosom of Buddha
     So, happy I am,



लिंब कोरतो सांबरशिंगी
  जुनी भाकीते नपुसकलिंगी

ह्या कडव्यातील लिंब म्हणजे जर्मन सेनानी फिल्डमार्शल विलहेल्म रीटर व्हॉन लीब. ह्याने पहील्या महायुध्दात भाग घेतला होता. हा नाझी पक्षाचा विरोधक असल्यामुळे हिटलर त्याच्यावर नाराज होता. त्यामुळे १९३८ साली त्याला बढती देउन त्याला हिटलरने निवृत्त केले. परंतु १९३९ साली त्याला परत बोलावण्यात येउन, सैन्याचा मोठा विभाग त्याच्या अधिपत्त्याखाली देण्यात आला. जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी बेल्जीयम सारख्या लहान देशाच्या भूमीचा वापर करण्यास उघडपणे विरोध करणारा तो एकमेव जर्मन सेनानी होता. त्याने असा ईशारा दिला होता की जर जर्मनीने कोणाच्याही बाजूने नसणाऱ्या तटस्थ बेल्जीयमवर हल्ला केला, तर सर्व जग जर्मनीच्या विरोधात जाइल. कारण बेल्जीयमच्या तटस्थ भूमिकेचा मान राखण्याची व त्या देशाचे संरक्षण करण्याची ग्वाही जर्मन सरकारने काही आठवड्यापूर्वीच दिली होती. त्यानंतर जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या चढाईत लीबने फ्रान्सची प्रसिध्द मॅजीनो तटबंदी भेदण्याची कामगिरी बजावली. ह्या कामगिरी बध्दल हिटलरने लीबला फिल्डमार्शल च्या पदावर बढती दिली व त्याला जर्मन सैन्यातील नाईट्स क्रॉस ऑफ द आयर्न क्रॉस हे मानाचे पदक देउन त्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्याने रशियातील आघाडीवर महत्वाची भूमिका बजावली. लीब हा जुन्या पठडीतील सेनानी असल्यामुळे हिटलरच्या अनेक व्युहात्मक योजना त्याला मान्य नसत. त्यामुळे १९४२ मध्ये लीबने हिटलरला, त्याला सेवामुक्त करण्याची विनंती केली व हिटलरनी ती मान्य केली. लीबची नाझी राजवटीबध्दलची भूमिका नेहमीच अनिश्चित होती. तो हिटलर व त्याच्या पाठीराख्यां बध्दल उघडपणे अपमानास्पद भाषा वापरायचा. पण त्याने नाझी पक्षाला त्याच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर २० जुलै १९४४ ला हिटलरला मारण्याचा कट फसल्यानंतर त्याने हिटलरवर निष्ठा व्यक्त केली होती. हे कृत्य त्याने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्याकरीता केले असावे असे मानले जाते. युध्द संपल्यानंतर न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने लीबला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली.
कवितेतील जुनी भाकिते म्हणजे लीबने केलेले, सर्व जग जर्मनीविरूध्द जाईल हे  भाकीत आहे .ही भाकीते सांबरशिंगी आहेत. सांबर जेव्हा जंगली श्वापदाच्या किंवा  शिकाऱ्याच्या पाठलागापासून बचावासाठी जंगलातून पळू लागते, तेव्हा त्याची  मोठी शिंगे झाडात अडकल्यामुळे त्याला पुढे पळता येत नाही. ते अलगद जंगली श्वापदाच्या भक्षस्थानी पडते. त्याप्रमाणे लीबने केलेली ही भाकीते त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयात त्याला  युध्दगुन्हेगार शाबीत करण्याकरीता वापरण्यात आली. हा खटला जर्मन हाय कमांड ट्रायल ह्या नावाने प्रसिध्द आहे. ह्या खटल्याचे कामकाजात लष्करी न्यायालयाच्या एका सदस्याने लीबला असे विचारले की, हिटलरने तुमचा तुमच्या मनाविरूध्द वापर केला. हिटलरला तुम्ही युघ्दापासून परावृत्त का केले नाही ? त्यावेळी  जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent)  झाले होते का ?    (Von Leeb was asked by a member of the Tribunal why it was that this leadership was impotent and helpless against Hitler)  कवितेतील  भाकीतांकरीता नपुसकलिंगी हे विशेषण वरील संदर्भास अनुसरून वापरले असावे.


ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
  नवी पाउले, पण मेलेली

हिटलरच्या युध्दविषयक धोरणाच्या  विरोधात अनेक जर्मन सेनानी होते, परंतु हिटलरच्या लोकप्रियतेमुळे ते फारसे काही करू शकत नव्हते. लीबच्या भाकीतात हिटलरची हत्त्या करण्याच्या कटाची बीजे रोवली गेली. १९४३ च्या मध्यावर, युध्दाचे पारडे निर्णायकपणे जर्मनीच्या पराभवाकडे झुकू लागले होते. जर्मन सेनानी आणि त्यांचे  साथीदार यांच्या असे लक्षात आले की जर्मनीला वाचवायचे असेल तर हिटलरला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सर्व कटवाले सक्रीय झाले व त्यांनी हिटलरला मारण्याचा कट रचला. हिटलरला मारल्यानंतर पुढील लष्करी व राजकीय व्यवस्था कशी लावायची, ह्याची विस्तृत योजना आखण्यात आली.  आधीची जी योजना होती त्यात बरेच बदल करून, नवीन योजना आखण्यात आली. ह्या योजनेला ऑपरेशन वाल्केरी (Valkyrie) असे नाव होते. कवितेतील नवी पावले म्हणजे ही नवीन योजना. ही पावले मेलेली का आहेत ? कारण हिटलरची हत्त्या करण्याचा कट फसला. त्यामुळे ही योजना कार्यान्वीत होउ शकली नाही. २० जुलै, १९४४ ला हिटलरच्या बंकरमधील कार्यालयात बाँबस्फोट घडवून आणून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कटवाल्यांनी केला.. परंतु हिटलर केवळ जखमी झाल्यामुळे हा कट अयशस्वी झाला. ह्या प्रसंगावर आधारीत वाल्केरी हा इंग्रजी चित्रपट नुकताच येउन गेला.

   शतशतकांच्या पायलन्स वरती
     किती कावळे टिंबे देती

पायलन्स (Pylon) ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कवितेतील पायलन्स ह्या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत आहे. ह्या शब्दाचा अर्थ ईजिप्तमधील देवळाचे स्मारकासारखे प्रवेशद्वार असा होतो. ईजिप्तच्या वास्तुकलेत हे पायलन्स प्राचीन  ईजिप्शियन संस्कृती , पंथ  यांचे प्रतीक म्हणून वापरले गेले. ह्या पायलन्स वर ईजिप्तच्या राजाची अधिकार दर्शवणारी चित्रे काढलेली असत. कवितेतील शतशतकांचा अर्थ प्राचीन असा असावा. शतशतकांचा म्हणजे शंभर शतकांचा. ईजिप्तची संस्कृती ही ख्रिस्तपूर्व काळातील असून ती हजारो वर्षापूर्वीची आहे. कवितेतील कावळे ह्या शब्दाचा संदर्भ दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ईजिप्तच्या भूमीवर झालेल्या लढायांशी आहे. तेव्हा ईजिप्तमध्ये अनेक देशांची सैन्ये लढत होती.  ईजिप्त हा देश पू्र्वी ब्रिटीशांच्या अंकीत होता. स्वतंत्र झाल्यानंतर सुध्दा सुएझ कालव्याच्या रक्षणाकरीता ब्रिटीश सैन्य तेथे होते. सुएझ कालव्यावर ताबा मिळवण्यासाठी इटलीने इजिप्तवर चढाई केली. इटालियन सैन्याच्या मदतीसाठी जर्मन सैन्य तेथे गेले. इजिप्तमधील अल् अलामेन येथे दोस्त राष्ट्रे व जर्मनी मित्र राष्ट्रे ह्याच्यात दोन ईतिहासप्रसिध्द लढाया झाल्या. ह्या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फ्रान्स, अमेरीका, ग्रीस, पोलंड, भारत वगैरे देशाची सैन्ये होती. तर विरूध्द बाजूस जर्मनी व इटलीचे सैन्य होते. कवितेतील कावळे म्हणजे हे  देश व त्यांची सैन्ये आहेत. ह्या देशांना इजिप्तच्या लोकांशी व तेथील प्राचीन संस्कृतीशी काही एक देणे घेणे नाही. हे इजिप्तमध्ये कावळ्यांसारखे  उपरे आहेत. टिंबे टाकती म्हणजे ह्याच्या युध्दात इजिप्तच्या साधनसंपत्तीचा नाश होत आहे आणि सामान्य इजिप्शियन जनतेचे हाल होत आहेत. सध्या अल अलामेनमध्ये जर्मन, इटालियन सैनिकांच्या वॉर सिमेट्री बरोबरच कॉमनवेल्थ देशातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशांच्या सैनिकांच्या पण वॉर सिमेट्री आहेत. एकमेकांविरूध्द लढून मरण पत्करलेल्या सैनिकांनी ह्या युघ्द स्मारकात चिरनिद्रा त्याच उपऱ्या भूमीवर घेतली आहे .
       
      उभा जागृती क्रियापदांचा
               खडा पहारा, पण रोबोंचा

ह्या ओळीतील क्रियापद ह्या शब्दाचा अर्थ व्याकरणातील क्रियापद असा नसून हा शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरला आहे. इंग्रजी मध्ये व्हर्बोटेन ( Verboten ) असा शब्द आहे. त्याचा एक अर्थ प्रतिबंध करणे (Forbidden)  असा आहे . हा शब्द जर्मन भाषेतून आलेला आहे. हा शब्द बोलण्यात वापरताना नाझी जर्मनीच्या  एकछत्री अंमलाचा निर्देश करण्याकरीता वापरला जातो. व्हर्बोटेन मधील व्हर्ब हा शब्द इंग्रजी भाषेत आहे व त्याचा अर्थ क्रियापद असा आहे. ह्या कडव्यातील क्रियापद म्हणजे हिटलरने जनरल रोमेलला पाठविलेली कुप्रसिध्द  आज्ञा आहे. जनरल रोमेल हा गाजलेला जर्मन सेनानी आफ्रीका कॉर्पस ह्या जर्मन सैन्य विभागाचा प्रमुख होता. तो डेझर्ट फॉक्स ( वाळवंटातील कोल्हा) या नावाने प्रसिध्द होता कारण त्याच्या रणनीतीमुळे जर्मन सैन्याला आफ्रीकेत विजय मिळाला होता. अल अलामेनच्या दुसऱ्या लढाईत विजयाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले होते. ब्रिटीश जनरल मॉंटगोमरी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा प्रमुख सेनापती होता. दोस्त राष्ट्रांच्या सतत चाललेल्या रणगाड्यांच्या व विमान हल्लयांमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. दोस्त राष्ट्रांकडे जर्मन सैन्याच्या तिप्पट सैन्य होते. रणगाडे, तोफा व इतर सामुग्रीच्या बाबतीत सुध्दा दोस्तांचे सैन्य वरचढ होते.  रोमेलसारख्या कसलेल्या सेनापतीच्या लक्षात आले की आता पराभव अटळ आहे. त्याने हिटलरला या सर्व गोष्टींची कल्पना दिली व सैन्य वाचवण्याकरीता माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगीतले. तेव्हा हिटलरने रोमेलला ती कुप्रसिध्द आज्ञा पाठवली. त्या आज्ञेत असे लिहीले होते की माघार घेण्यास बंदी आहे. तुमच्या समोर विजय किंवा मरण हे दोनच पर्याय आहेत. ( Retreat is forbidden. “ Victory or Death”) . पराभव व सैन्याचा विनाश डोळ्यासमोर दिसत असतानाही रोमेलने हिटलरची आज्ञा पाळण्यासाठी लढाईची तयारी सुरू केली उभा जागृती क्रियापदांचा हे कवितेतील शब्द रोमेलला उद्देशून आहेत. जागृती म्हणजे जागणारा . क्रियापद म्हणजे हिटलरची आज्ञा . रोमेल हिटलरच्या आज्ञेला किंवा हुकूमाला.जागून युध्दास उभा राहीला. रोमेल क़डे सैन्य कमी असल्यामुळे, दोस्त सैन्याला रोखण्याकरीता त्याने वेगळा उपाय योजला. त्याच्या सैन्याने त्या प्रदेशात भुसुरूंग (landmines) पेरून ठेवले व काटेरी ताराची कुंपणे घातली. लढाईपूर्वी  तीस लाखांच्यावर भुसुरूंग ह्या भागात पेरण्याच आले. रोमेलने ह्या भागाचे नाव डेव्हील्स गार्डन असे ठेवले होते. खडा पहारा पण रोबोंचा ह्या ओळीचा संदर्भ रोमेलच्या ह्या कृतीशी असावा. रोबो म्हणजे यंत्रमानव. भुसुरूंगांना रोबोची उपमा दिली आहे. हे भुसुरूंग ओला़डून येणे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला व रणगाड्यांना अवघड पडत होते.  खडा पहारा करत होते म्हणजे भुसुरूंग २४ तास कार्यरत होते. सैनिकांना झोप वगैरे असते तशी या भुसुरूंगाना नसते, म्हणून त्यांना ख़डा पहारा करणाऱ्या रोबोंची ऊपमा दिली आहे. हे भुसुरूंग आजही अल अलामेनच्या प्रदेशात जमीनीखाली पेरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हा भाग निर्मनुष्य आहे. चुकून ह्या भागात गेल्यामुळे अनेक सामान्य नागरीकांवर प्राण गमावण्याची पाळी आली आहे.

अढळ धृवाचा ढळला तारा
       सप्तर्षींचा चुकला प्रश्न

यातील अढळ धृव म्हणजे जपान आहे. दुसऱ्या महायुध्दात जपान शेवटपर्यंत शरण येत नव्हता. तो त्याच्या शरणागती न पत्करण्याच्या निर्णयापासून ढळला नव्हता. अखेर अमेरीकेने अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली व त्याच्या अढळ अशा निर्णयापासून तो ढळला. हे सप्तर्षी कोण आहेत ?  हे सात अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. अमेरीकेने अणुबाँबचा युध्दात उपयोग करण्यापूर्वी, जपानविरूध्द शरण आणण्याकरीता, अणु़बाँबच्या उपयोग करावा की नाही हे ठरवण्यासाठी  सात शास्त्रज्ञांची समिती जेम्स फ्रँक या  अणु शास्त्रज्ञाच्या अध्यक्षते खाली, नेमली होती. ह्या समितीने अणुबाँबचा उपयोग करू नये असा असा सल्ला दिला. ह्या समितीने असा सल्ला दिला होता की अणुबाँबचा स्फोट एखाद्या वैराण वाळवंटात सर्व देशांच्या प्रतिनीधीँसमोर घडवून आणून त्याची विनाशाची  क्षमता सर्व देशांना पटवून द्यावी. समितीचे असे म्हणणे होते की अणुबाँब तयार करण्याच्या कृतीचे गुपीत अमेरीका सर्व काळ, त्यांच्याकडे ठेवू शकणार नाही व यातून आतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागेल. ही स्पर्धा जगाला विनाशाकडे नेईल. अमेरीकेने जर अणुबाँबचा प्रथम जपानविरूध्द उपयोग केला तर अमेरीकेला जगातील सर्व लोकांचा विश्वास गमवावा लागेल. ह्या समितीचा सल्ला धुडकावून लावून अमेरीकेने जपानमधील हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब टाकलेच.
गारठल्यावीण गळती गारा
        अन् रेडिओवर राधेकृष्ण
गारा पाउस चालू असताना हवेतील थंडपणामुळे म्हणजेच गारठल्यावर गळतात. मग ह्या गारठल्या शिवाय गळणाऱ्या गारा कोणत्या आहेत ?  ह्या गारा अणुबाँबच्या स्फोटानंतर प़डणाऱ्या पावसाबरोबर पडणाऱ्या गारा आहेत. हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब पडल्यावर काही वेळातच तेथे काळा पाउस पडला. ह्या पावसाचे थेंब काळ्या रंगाचे होते. ते जड होते व त्याचा शरीराला मार लागत होता. त्या थेंबात राख होती व धूर होता. ह्या पावसात घातक किरणोत्सर्गी द्रव्ये होती. ह्या अणुबाँब मुळे ही दोन्ही शहरे बेचिराख झाली आणी तेथील लाखो निरपराध माणसे मरण पावली.
हे अणुबाँब टाकल्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी, अमेरीकन अध्यक्ष हॅरी ट्रूमन (Harry Truman) यांनी अमेरीकन जनतेला उद्देशून रेडीओवरून भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरीकेने जपानवर अणुबाँब टाकल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले व हा निर्णय घेण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. ह्या भाषणात शेवटी हे नवीन अस्त्र शत्रुंच्या हातात न देता अमेरीकेच्या हातात देण्याबध्दल देवाचे आभार मानले. त्यांनी देवाची अशी प्रार्थना केली की हे अस्त्र देव कार्याकरीता, योग्य मार्गाने वापरण्याबध्दल त्याने अमेरीकेला मार्गदर्शन करावे.  (We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.)
रे़डिओवर राधेकृष्ण हे कवितेतील शब्द ह्या भाषणाच्या संदर्भात आहेत. एकीक़डे अणुबाँबच्या भीषण परीणामांची पूर्ण कल्पना असताना अणुबाँब चा वापर करून लाखो निरपराध जपानी नागरीकांची हत्त्या घडवून आणायची आणि दूसरीकडे रेडीओवर देवाचे नाव घ्यायचे, असा हा विरोधाभास कवितेतील ह्या ओळीत दाखविला आहे.

Sunday, June 24, 2012

मर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण


          आला आषाढ – श्रावण,
         आल्या पावसाच्या सरी ;
          किती चातकचोचीने
          प्यावा वर्षाऋतू तरी !
काळ्या ढेकळांचा गेला
गंध भरून कळ्यांत ;
          काऴ्या डाबरी रस्त्याचा
        झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओलीं चिरगुटें झालीं;
        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
        आणि पोपटी रंगाची
        रान दाखविते नक्षी.
ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
        धावणाऱ्या क्षणालाही
        आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
                  येतां आषाढ श्रावण
         निवतात दिशा-पंथ.
         आला आषाढ-श्रावण
          आल्या पावसाच्या सरी;
          किती चातक – चोचीने
          प्यावा वर्षाऋतु तरी !

                  बा. सी. मर्ढेकर
मर्ढेकरांची ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी पावसाचे पाणी पीत आहेत, मेघ लाली हुंगत आहेत वगैरे, वगैरे. परंतु या कवितेतील काही ओळी खटकतात. उदा.  ओशाळला येथे यम. पावसाने न्हाईलेल्या सृष्टीचे वर्णन करताना अचानक यमाची कवितेत आठवण का यावी ?  यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले,  तरी त्यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे ?  आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का ? ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता ?    तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत ?  या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते ?  पावसाने डांबरी रस्ता धुतला गेल्यामुळे एक वेळ निर्मळ होणे शक्य आहे, परंतु तो निवांत कसा होईल
विचार करून सुध्दा  ह्या प्रश्नांची सर्मपक  उत्तरे मिळाली  नाहीत. शेवटी अशा निश्कर्षापाशी पोहोचलो, की मर्ढेकरांच्या इतर अनेक कवितांसारखा हा प्रतिमांचा खेळ असावा. अनेक संदर्भ शोधता शोधता अखेर दुसऱ्या महायुध्दा काळात जाऊन पोचलो. तिथे मला या पावसाचा संदर्भ सापडला. व कवितेचा अर्थ हळूहऴू लक्षात येऊ लागला. हा पाउस काही आपला नेहमीचा पाऊस नाही. हा विनाशाचा पाऊस  आहे.  अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी या शहरांवर अणुबॉंब  टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी पाऊस आहे. ही कविता कळण्यासाठी खालील संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.
  दुसऱ्या महायुध्द निर्णायक अवस्थेला पोचले होते. दोस्त राष्ट्रांचा युरोपमध्ये विजय झाला होता. जर्मनीने पराभव मान्य केला होता. इटलीसुध्दा पराभूत झाला होता. जपान मात्र पराभव मान्य करायला तयार नव्हता.  1945 च्या जुलै महीन्यात जर्मनीतील पोस्टडॅम येथे दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद भरली होती. त्या परिषदेस अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, रशियाचे राष्ट्रप्रमुख जोसेफ स्टॅलिन हे  हजर होते. या परिषदेत इतर प्रश्नांबरोबरच जपानच्या शरणागतीच्या अटी ठरविण्यात आल्या. ह्या अटींच्या मसुद्याला पोस्टडॅम डिक्लेरेशन असे नाव आहे. जपानला या अटी कळवण्यात आल्या व शरणागती पत्करण्याकरीता अंतिम मुदत देण्यात आली व शरणागती न पत्करल्यास कोणते गंभीर परिणाम जपानला भोगावे लागतील याचा ईशारा देण्यात आला. यात जपानला शरण न आल्यास जपानवर अतिशय विनाशकारी अशा अस्त्राचा वापर करण्यात येइल अशी धमकी अमेरीकेने दिली होती. त्यात अणुबाँबचा कुठेही उल्लेख नव्हता. पण अणुबाँब टाकण्याची गर्भीत धमकी होती कारण पोस्टडॅम परिषद चालू होण्यापूर्वी एक दिवस आधीच अमेरीकेने अणुबाँबची चाचणी घेतली होती. व ती यशस्वी झाली होती. अमेरीकेच्या विमांनानी सामान्य जपानी जनतेच्या माहीतीकरीता जपानच्या शहरांवर पत्रकेही टाकली. त्या पत्रकात असे लिहीले होते की, जपानच्या जनतेनी त्यांच्या सम्राटाला शरणागती पत्करायची विनंती करावी.  जपान सरकारने अमेरीकेच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देऊन, ते त्यांना मान्य नसल्याचे ध्वनित केले. याची परिणीती अमेरीकेने, 6 ऑगस्ट 1945 रोजी, जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकण्यात झाली. ह्या अणुस्फोटामुळे हिरोशिमा शहराचा बरासचा भाग ऊध्दवस्त झाला व लाखो लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोक जखमी झाले. तसेच किरणोत्सर्गाचे भयानक परिणाम निरपराध तेथील  नागरीकांना भोगावे लागले.
त्याच दिवशी अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन ह्यांनी रेडीओवर भाषण करून व एक पत्रक काढून जपानवर अणुबाँब टाकल्याचे जाहीर केले. त्यात त्यांनी जपान शरण न आल्यास त्यांना ह्या पृथ्वीतलावर पाहिला नसेल अशा सर्वनाशाच्या पावसाला” ( Rain of Ruin) सामोरे जावे लागेल , अशी धमकी जपानला दिली. ( If they do not now accept our terms they may expect a rain of ruin from the air, the like of which has never been seen on this earth. Behind this air attack will follow sea and land forces in such number that and power as they have not yet seen and with the fighting skill of which they are already well aware.) ह्या आवाहनाला सुध्दा जपान सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील नागासकी या शहरावर अमेरीकेने दुसरा अणुबाँब टाकला. त्यादिवशी हॅरी ट्रुमन ह्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात खालील उद्गार काढले.
I realize the tragic significance of the atomic bomb... It is an awful responsibility which has come to us... We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.
—President Harry S. Truman, August 9, 1945
त्यानंतर जपानच्या मंत्रीमंडळात शरणागती पत्करायची की नाही , ह्या मुद्दयावरून दोने तट पडले. अखेर जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला.
आता कवितेकडे वळू.
          आला आषाढ – श्रावण,
         आल्या पावसाच्या सरी ;
          किती चातकचोचीने
          प्यावा वर्षाऋतू तरी !

आषाढ व श्रावण ह्या महीन्यात दरवर्षीच पाउस येतो. मग हा पाउस वेगऴा कसा ?  येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला.  6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यातील होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती.  मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने  कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी ! “.  ह्या ओळी उपरोधीक अर्थाच्या आहे. शेवटी असलेले ऊद्गारवाचक चिन्ह उपरोधीक अर्थ अधोरेखित करण्यासाठी वापरले असावे. चातक पक्षी हा पावसाचेच पाणी चोचीने पीत असतो अशी कविकल्पना आहे. त्यामुळे तो पावसाची वाट आतुरतेने बघत असतो. हा विनाशाचा पाउस आहे. अणुस्फोटानंतर हिरोशिमा शहरावर एक तासानंतर काळ्या रंगाचे थेंब असलेला पाऊस झाला. ह्या पावसात किरणोत्सर्गी द्रव्ये होती. त्यामुळे हे पाणी विषारी होते. स्फोटात भाजलेली अनेक माणसे तहानेनी तळमळत होती. त्यांनी तहान भागविण्याकरीता हे पाणी पिले. त्या पाण्यातील किरणोत्सर्गी द्रव्याची बाधा होऊन ती माणसे मृत्युमुखी पडली.

काळ्या ढेकळांचा गेला
गंध भरून कळ्यांत ;
          काऴ्या डांबरी रस्त्याचा
        झाला निर्मळ निवांत.

ह्या कडव्यातील काळी ढेकळे शेतात असणारी काळी ढेकळे नाहीत. ती आहेत अणुबाँबच्या स्फोटामुऴे जळून उध्दवस्त झालेल्या हिरोशिमा शहरातील उरलेली ढेकळे. ह्या स्फोटात हिरोशिमा शहरातल्या बहुतांश इमारतींना आगी लागल्या व लाकडी असलेल्या इमारती जळून गेल्या. कळ्यांची प्रतिमा तेथील लहान मुलांकरीता वापरली असावी.  ढेकळांचा गंध कळ्यात कधी भरेल ? त्या कऴ्या मातीत मिळाल्यावरच. बाँबस्फोटानंतर तेथील रस्ते, पावसामुळे धुतले गेले होते. त्या काळ्या डांबरी रस्त्यावर, काऴ्या थेंबाचाच पाऊस पडल्यामुळे ते निर्मळ झाले असावेत. काळ्या डांबरावर काळ्या रंगाचेच पावसाचे पाणी पडल्यामुळे कदाचित ते जास्तच स्वच्छ दिसत असावेत. तसेच माणसेच न ऊरल्यामुळे ते रस्ते निर्मनुष्य म्हणजेच निवांत झाले होते. खाली हिरोशिमा शहराची बाँबस्फोटाच्या आधीचे व नंतरचे  विमानातून घेतलेले  छायाचित्र दिलेले आहे. त्यात डांबरी रस्त्यांची स्थिती दिसत आहे.





 हिरोशिमा – अणुबाँब स्फोटापूर्वीचे छायाचित्र


 

    
                      हिरोशिमा – अणुबाँब स्फोटानंतरचे छायाचित्र 
                   ” काऴ्या डांबरी रस्त्याचा , झाला निर्मळ निवांत.




चाळीचाळीतून चिंब
ओलीं चिरगुटें झालीं;
        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली

ह्या पावसातील चिंब झालेल्या चिरगुटांचा संदर्भ वेगळा आहे. ही चिरगुटे स्फोटात भाजलेल्या लोकांचे कपडे असावेत. ते कपडे उष्णतेमुळे  त्यांच्या अंगालाच चिकटून बसले होते. 




        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली.
        
    नागासकी शहरातील बहुतेक घरे लाकडाची होती व त्यावर कौले होती. ही कौले त्या पावसामुळे ओली झाली होती. ह्या कडव्यातील मेघ म्हणजे नेहमी पावसात असतो तो ढग नव्हे. हा ढग आहे अणुबाँबच्या स्फोटानंतर तयार झालेला ढग. ह्या ढगाला शास्त्रीय परिभाषेत मश्ऱूम क्लाउड (Mushroom Cloud)  असे नाव आहे. हा ढग लाली हुंगतो आहे. ही लाली स्फोटात मृत वा जखमी झालेल्या माणसांच्या रक्ताची लाली  आहे. 


 

                        Mushroom cloud after atomic bombing on Hiroshima and Nagasaki


ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
        आणि पोपटी रंगाची
        रान दाखविते नक्षी.

वरील कडव्यात उल्लेख केलेल्या पानातल्या रेषा , ओले पक्षी या  प्रतिमा आहेत. ही प्रत्यक्षातील पावसात ओली झालेली झाडांची पाने वा ओले पक्षी नव्हेत. ही ओली पाने म्हणजे अमेरीकेच्या विमानांनी जपानी शहरांवर टाकलेली पत्रके (leaflets) असावीत. पाने हा शब्द इंग्रजीतील leaflets या शब्दावरुन घेतला असावा. (Leaf = पान) पानातील रेषा म्हणजे पत्रकातील मजकूरा मागे दडलेला गर्भितार्थ. ह्या रेषांचा संदर्भ इंग्रजीतील to read between the lines या वाकप्रचाराशी असावा. ही पाने ओली आहेत. पण ती काही विनाशाच्या पावसाने ओली झालेली नाहीत. त्या पत्रकात जपानी जनतेने त्यांच्या सरकारला व सम्राटाला शरणागती पत्करण्याची विनंती करावी असे भावनिक आवाहन केलेले आहे. असे भावनीक ओलेपण त्या पानात असल्यामुळे, ओली पाने असे शब्द वापरलेले असावेत.  अशा ह्या ओल्या पानातील  रेषा, ओले पक्षी वाचत आहेत. हे पक्षी कोणते आहेत. हे पक्षी म्हणजे जपानी युध्दसमितीतले सदस्य असावेत. जपानने कोणताही युध्दविषयक निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली होती. सुप्रीम वॉर कॉन्सिल (Supreme War Council)  असे या समितीचे नाव होते. या समितीचे सहा सदस्य होते. आण्विक हल्ल्यानंतर  जपानने शरणागती पत्करावी की नाही या मुद्द्यावरून या सदस्यात खडाजंगी झाली. ह्या समितीतील तीन जहाल मतवादी सदस्य शरणागती पत्करू नये अशा मताचे होते, तर उरलेले तीन मवाळ मताचे सदस्य शरणागती पत्करावी या मताचे होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करी बळावर प्रश्न सोडवण्याची तरफदारी करणाऱ्या राजकारण्यांना ससाणे (Hawks) म्हणतात व लष्करी बळाचा वापर न करण्याच्या मताच्या राजकारण्यांना  कबुतरे (Doves)  म्हणतात. ही समिती ससाणे व कबुतरांच्यात विभागली गेले असा उल्लेख  आहे. हे  पक्षी ओले झालेले आहेत म्हणजेच विनाशाच्या पावसामुऴे (अणुहल्ल्यामुळे) हतबुध्द झालेले आहेत. ज्याप्रमाणे ओला झालेला पक्षी लौकर उडू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे संमिती सदस्य तात्काल शरणागती पत्करण्याचा  निर्णय घेउ शकत नव्हते. अखेर जपानचे सम्राट हिरोहिटो ह्यांच्यासमोर निर्णयासाठी हा प्रश्न ठेवण्यात आला. जहाल गटांच्या सदस्यांनी सम्राटांना सांगितले की जपानी लष्कर व जपानी जनता शरणागती पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटचा माणूस जीवंत असेपर्यंत लढण्याची तयारी आहे. व जपानी जनता पराभव पत्करण्यापेक्षा हाराकीरीने मरणाला जवळ करेल. शरणागती पत्करल्यास लष्करात बंड होईल. परंतु हिरोशिमा, नागासकीत झालेली मनुष्यहानी व त्याचवेळी रशियाने जपानच्या ताब्यात असलेल्या मांचुरियावर केलेला हल्ला या गोष्टींचा विचार करून आणखी मनुष्यहानी टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला. आणि पोपटी रंगाची, रान दाखविते नक्षी , ह्या ओळींचा संदर्भ बहुधा रशियाने मांचुरियावर केलेल्या आक्रमणाशी असावा.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
        धावणाऱ्या क्षणालाही
        आली ओलसर गोडी.

हिरोशिमा व नागाकीवरील अणुबाँबच्या स्फोटात सुमारे दोन लाखांच्यावर निरपराध  माणसे मारली गेली. अणुस्फोटातून निर्माण झालेल्या अति उष्णते मुळे  अनेक माणसे भाजून व होरपळून मेली. त्यांना अक्षरशः यमयातना भोगावा लागल्या. उरलेल्या माणसांना किरणोत्सर्गाची बाधा होऊन, त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याचे परीणाम भोगावे लागले. तेथील दृष्य बघून प्रत्यक्ष यमसुध्दा ओशाळला असता. ह्या अणुस्फोटामुळे हजारो विजा एकाच वेळी चमकल्यावर जो प्रकाश निर्माण होइल, एवढा प्रकाश पडला. तो प्रकाश पाहून वीज सुध्दा ओशाळली असती.  
   ह्या अणुबाँब स्फोटानंतर जपानने शरणागती पत्करली व सतत चार वर्षे चाललेले दुसरे महायुध्द अखेर समाप्त झाले. त्यामुळे हा क्षण गोड झाला असावा. परंतु ही गोडी किंवा शांतता स्फोटात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध माणसाच्या  रक्ताने माखलेली आहे. ओलसर हा शब्द त्या अनुषंगाने वापरला असावा.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
                  येतां आषाढ श्रावण
         निवतात दिशा-पंथ.

जपानने शरणागती पत्करायचा निर्णय जपानच्या लष्करातील अनेक अधिकाऱ्यांना मान्य नव्हता. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जपानी लष्कराच्या काही तुकड्यांनी बंड केले व जपानच्या सम्राटांचा राजवाड्याला वेढा घातला. तेथील सुरक्षासैनिकांना ठार करून सम्राटांना ताब्यात घेतले व त्यांनी शरणागतीला मान्यता देऊ नये असा आग्रह धरला. परंतु त्यापूर्वीच सम्राटांचे शरणागती जाहीर करणारे ध्वनीमुद्रीत भाषणाची रेकॉर्ड राजवाड्यातून गुप्तपणे बाहेर काढण्यात आली होती व ते जपानची शरणागती जाहीर करणारे भाषण रेडिओ जपानवरून दि. 15 ऑगस्ट 1945 रोजी प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर शरणागती पत्करण्यास विरोध असणाऱ्या लष्करी अधिकारी, सैनिक व काही जपानी नागरीकांनी हाराकीरी करून मरण पत्करले. नंतर बंड हळूहळू थंड झाले. मनी तापलेल्या तारा, जरा निवतात संथ  ” या ओळींचा संदर्भ वरील घटनाक्रमाशी असावा. जपानच्या जनतेची व लष्कराची मानसिकता शरणागती न पत्करण्याची होती. ती संथपणे बदलत जाऊन दि. 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने समारंभपूर्वक शरणागती पत्करली .
निवतात दिशा पंथ ह्या ओऴीचा संदर्भ नागासकी शहरावर झालेल्या अणुबाँब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या चर्चशी आहे. नागासकी हे जपानमधील ख्रिश्चन धर्माचे महत्वाचे केंद्र होते. पंधराव्या शतकापासून तेथे जपानमधील ख्रिश्चन धर्माची सुरवात झाली. नागासकीत ख्रिश्चन लोकांची संख्या बरीच होती. 9  ऑगस्ट 1945 ला सकाऴी 9 वाजता नागासकीतील  ऊराक्रामी कॅथेड्रल मध्ये अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थने करीता जमले होते.  तेथुन अवघ्या 500 मीटर्सवर  वर ( Ground  Zero) अणुबाँबचा स्फोट झाला. त्यामुऴे हे प्रार्थनास्थळ उध्वस्त झाले व प्रार्थनेस जमलेले सर्व लोक मरण पावले. नागासकी हे अणुबाँब टाकण्यासाठीचे टारगेट ठरविताना अमेरीकेच्या सरकार ला नागासकीत ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे व उराक्रामी कॅथेड्रल हे पूर्व आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे स्थान आहे याची पूर्ण कल्पना होती. अमेरीकेची लोकसंख्येत सुध्दा ख्रिश्चन धर्मीय जास्त होते. तरीसुध्दा नागासकी हे लक्ष्य ठरविण्यात आले. त्यावेळी राजकीय स्वार्थापुढे कोणत्याही दिशा-पंथाचा विचार गौण ठरला. निवतात दिशा-पंथ या ओऴीचा संदर्भ वरील घटनेशी असावा.

बी.बी.सी. च्या संकेतस्थऴावरील "विनाशाच्या पावसाची " दिनांक 6 ऑगस्ट 1945 ला प्रसिध्द झालेल्या बातमीकरीता खालील दुव्यावर टिचकी मारा.

1945 : A Rain of ruin from air